
बोरी (कोकाटे) | प्रतिनिधी : शुभम सराफ, हिंगणी |
गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी केली. मात्र सेलू तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या बोरी (कोकाटे) गावात गेल्या तब्बल १४ वर्षांपासून जलकुंभ उभा असला तरी त्यामध्ये पाणीच पोहोचले नसल्याने नागरिकांना आजही शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
सन २०१०-११ दरम्यान तत्कालीन सरपंच अमर कोकाटे यांच्या कार्यकाळात बसस्थानक परिसरात मोठ्या जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. तसेच लगतच विहीर खोदून गावासाठी शुद्ध पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यात आली. जलकुंभ उभारला जात असताना गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. लवकरच प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र सरपंचांचा कार्यकाळ संपल्यानंतर योजना रखडली आणि जलकुंभ आजही वापराविना उभा आहे.
यानंतरच्या काळात विविध सरपंचांनी योजना पूर्ण करण्याचे प्रयत्न केल्याचा दावा केला. माजी सरपंच विशाल भांगे यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घराला मोफत नळ कनेक्शन देण्याचे काम सुरू होते. मात्र प्रशासकीय बदल आणि इतर कारणांमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही.
दरम्यान, सरपंच रोशन मस्के यांच्या कार्यकाळात नागरिकांकडून अर्ज व अनामत रक्कम घेऊन नळ योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले. अनेक ग्रामस्थांनी पैसे भरले, मात्र नळ घरापर्यंत पोहोचलेच नाहीत. त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीकडे योजना हस्तांतरित करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले.
गावातील वाढती समस्या लक्षात घेऊन जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. नवीन जलकुंभ उभारण्यात आला आणि काही भागात पाणीपुरवठा सुरू झाल्याचे सांगितले जाते. मात्र जुन्या जलकुंभाच्या परिसरातील अनेक नागरिक आजही पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थ शेखर बुधबावरे यांनी सांगितले की, गावातील शांतीनगर व इतर परिसरातील ३० ते ४० घरांसाठी स्वतंत्र टाकी उभारण्यात आली. मात्र या टाकीतून अनेक दिवसांपासून पाणीच आले नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
एकीकडे गावाजवळ धरण असूनही नागरिकांच्या घशाला पाण्यासाठी कोरड पडत आहे. त्यामुळे १४ वर्षांपासून रखडलेल्या या योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच जलजीवन मिशन अंतर्गत खर्च झालेल्या ३९ लाख रुपयांचा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
“धरण उश्याशी, कोरड घशाशी” अशी परिस्थिती बोरी (कोकाटे) गावात निर्माण झाली असून प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.










