
सेलू येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतील भोंगळ कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून एका ग्राहकाने आपले खाते बंद करण्यासाठी अर्ज दिला असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. वारंवार बँकेत चकरा मारूनही संबंधित ग्राहकाला समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याची तक्रार आहे.ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, खाते बंद करण्याबाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. तसेच नगदी रक्कम जमा किंवा काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना “लिंक नाही”, “लिमिट संपली”, “उद्या या” अशा कारणांवरून वारंवार परत पाठविले जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. विशेष म्हणजे, शाखा व्यवस्थापकांकडे तक्रार घेऊन गेलेल्या ग्राहकांना योग्य प्रतिसाद मिळण्याऐवजी उलट खाते बंद करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. “बँकेची व्यवहार मर्यादा वाढविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे का?” असा साधा प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकालादेखील “तुम्ही आम्हाला शिकवू नका, खाते बंद करून देतो” अशा स्वरूपाची भाषा वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, नवीन खाते उघडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनाही निराशेचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. “नवीन खाते लगेच उघडता येणार नाही”, “तीन महिने लागतील”, “वीस हजार रुपये जमा करावे लागतील” अशी उत्तरे देऊन ग्राहकांना परत पाठविले जात असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, ही परिस्थिती नवीन नसून यापूर्वीही बँकेतील अंतर्गत वाद आणि कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादाचे प्रकरण चांगलेच गाजले होते. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात येत आहे. ग्राहकांचा इशारा बँकेतील कथित मनमानी, ग्राहकांची होणारी गैरसोय आणि वारंवार होणाऱ्या तक्रारी लक्षात घेता वरिष्ठ कार्यालयाने तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा ग्राहकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी सेलू शाखेतील परिस्थितीमुळे सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक व्यवहार खोळंबत असून बँकेच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. त्यामुळे भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून परिस्थिती सुधारावी व ग्राहकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

“ग्राहक त्रस्त, अधिकारी मस्त? सेलू









