
सेलू तालुक्यात संतापाचे वातावरण, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
पोलिस स्टेशन सेलू द्वारा मिळालेल्या माहितीनुसार, सेलू तालुक्यातील केळझर येथे एका पीडित युवतीच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचे प्रकरण समोर आले असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत एका तरुणीचा विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर धमकी, मानसिक दबाव व फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिचे वारंवार शारीरिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक तक्रार सेलू पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी फैजल फिरोज शेख (रा. केळझर) याने केळझर येथीलच पीडित युवतीसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून संपर्क वाढवला. सुरुवातीला मैत्रीचे नाटक करत आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिरायला जाण्याच्या बहाण्याने तिला बोरधरण परिसरात नेऊन तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी आरोपीने जबरदस्ती करत पीडितेसोबत फोटो काढले व ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव निर्माण केला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडित युवतीने विरोध केल्यानंतरही आरोपीने तिचे वारंवार शारीरिक शोषण करत मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच “माझ्याशी लग्न कर, अन्यथा तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,” अशी धमकी दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकारामुळे पीडित युवती व तिचे कुटुंबीय भयभीत झाले होते.
अखेर पीडित युवती व तिच्या कुटुंबीयांनी सेलू पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली. सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 सह विविध गंभीर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास ठाणेदार मनोज गबने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. डी.बी. पथकातील मनोहर मुळे, अखिलेश गव्हाणे, सचिन वानखेडे, विनायक गोडे आणि ओमप्रकाश टल्लारी यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. आरोपी सध्या पीसीआरमध्ये असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
या घटनेनंतर सेलू तालुक्यात संतापाची लाट उसळली असून युवक-युवतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेक तरुणी भावनिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि शारीरिक शोषणाच्या जाळ्यात अडकत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करीत आहेत.
समाजातील जाणकारांनी शाळा, महाविद्यालये व ग्रामीण भागात विशेष जनजागृती मोहिमा राबविण्याची मागणी केली आहे. सोशल मिडियावरील अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास न ठेवणे, कोणतीही धमकी मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधणे आणि पालकांनीही आपल्या मुलांच्या मोबाईल वापरावर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सदर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

केळझर येथे समोर आले कथित









