
हजारी ट्रस्ट नेमके करते तरी काय? भक्तांचा संतप्त सवाल
सेलू, प्रतिनिधी : सेलूमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण चक्रीवादळामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक वृक्ष उन्मळून पडले, वीज खांब कोसळले, तर अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. या वादळाचा फटका सेलूतील प्राचीन व प्रसिद्ध शंकरजी मंदिरालाही बसला. मंदिराच्या नदीकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर प्रचंड मोठे झाड कोसळून पडले असून त्यासोबत विजेच्या ताराही तुटल्या आहेत. मात्र घटना घडून तब्बल पाच ते सहा दिवस उलटून गेले तरी ना झाड हटविण्यात आले, ना विजेच्या तारा जोडण्यात आल्या. त्यामुळे मंदिर परिसर आजही अंधारात बुडालेला आहे.विशेष म्हणजे, हे मंदिर सेलूतील अत्यंत श्रद्धास्थान मानले जाते. दररोज मोठ्या संख्येने भक्त येथे दर्शनासाठी येतात. रात्री महिलाही पूजा-अर्चेसाठी मंदिरात येत असतात. मात्र तुटलेल्या तारा, पडलेले झाड आणि अंधारामुळे मंदिर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन आणि संबंधित ट्रस्ट जागे होणार का, असा संतप्त सवाल आता भक्तांकडून उपस्थित केला जात आहे.भक्तांच्या म्हणण्यानुसार, शंकरजी मंदिराच्या नावाने सेलूमध्ये दोन ते तीन एकर शेती असून त्याचा ठेका दिला जातो. तसेच मंदिराच्या नावाने मोठे मंगल कार्यालयही असून त्यातूनही मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. मंदिरातील मोठ्या तिजोऱ्यांमध्ये भक्तांकडून दररोज मोठ्या प्रमाणात दान जमा होत असल्याचे सांगितले जाते. एवढी आर्थिक आवक असताना मंदिर परिसरातील एक पडलेले झाड हटविण्यासाठी आणि विजेच्या तारा जोडण्यासाठी कोण पुढे येत नाही, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.“दोन मजूर लावून झाड तोडायला एवढा वेळ का लागत आहे? मंदिरातील लाखोंच्या उत्पन्नाचा पैसा नेमका जातो कुठे? जर मंदिरातील सर्व आर्थिक व्यवहार हजारी ट्रस्टकडे असतील, तर मंदिराच्या देखभालीची जबाबदारीही ट्रस्टनेच घ्यायला नको का?” असे थेट प्रश्न आता भक्तगण विचारू लागले आहेत.महावितरण कंपनीवरही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या दिवसांपासून तुटलेल्या विजतारा तशाच पडून आहेत. या तारांमुळे एखादी जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.शंकरजी मंदिर हे सेलूच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानले जाते. मात्र आज या मंदिराची अवस्था अत्यंत दुर्लक्षित झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे प्रशासन, महावितरण कंपनी आणि हजारी ट्रस्ट यांनी एकमेकांकडे बोट न दाखवता तातडीने कारवाई करून पडलेले झाड हटवावे, विजेचा पुरवठा सुरळीत करावा आणि मंदिर परिसर सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी भक्त व नागरिकांकडून होत आहे.




उत्पन्न लाखोंचे… पण शंकरजी मंदिर









