
सेलू : सध्या सेलू शहरातील Bank of India शाखा नव्या वादांमुळे चांगलीच चर्चेत आली असून नागरिकांच्या तक्रारींनी ती अक्षरशः समस्यांचे माहेरघर बनली आहे. वाढत्या ४५ अंश तापमानात नागरिकांना बँकेच्या निष्काळजी कारभाराचा फटका बसत आहे.
शाखेत साध्या e-KYC प्रक्रियेसाठी नागरिकांना महिनाभर चकरा माराव्या लागत आहेत, तरीही काम होत नसल्याची तक्रार सर्वसामान्यांकडून होत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना वारंवार ये-जा करावी लागत असून त्यांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असताना लोकांना पैशांची तातडीची गरज असते, मात्र बँकेत ५,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. “बँकेत पैसे नाहीत” असे कारण सांगितले जात असले तरी व्यापारी व आर्थिकदृष्ट्या सक्षम ग्राहकांना मात्र हवी तेवढी रक्कम दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
बँकेत पिण्याच्या पाण्याचीही कोणतीही व्यवस्था नसल्याने भर उन्हात तासन्तास रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांची अवस्था बिकट होत आहे. कर्मचाऱ्यांचे वर्तनही उद्धट व हेकेखोर असल्याच्या तक्रारी वाढत असून, रोजच्या गर्दीत नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
या सर्व प्रकाराविरोधात आज शिवसेना (शिंदे गट) तर्फे बँक प्रशासनाला निवेदन देण्यात आले. लवकरात लवकर समस्या सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
निवेदन देताना उपस्थित:
रोशन कोंबे – शिवसेना सेलू तालुकाप्रमुख
रोशन राऊत – शिवसेना वर्धा-सेलू विधानसभा संघटक
ओम टवलारे – शिवसेना सेलू शहर प्रमुख
तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
नागरिकांचा संताप वाढतोय — प्रशासन कधी जागं होणार?











