
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान झालेल्या त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या महिलांना राज्य शासनाने दिलासा देत दुरुस्तीची अंतिम संधी उपलब्ध करून दिली आहे. या अनुषंगाने ३१ मार्च ही ई-केवायसी दुरुस्तीसाठी अंतिम तारीख निश्चित करण्यात आली असून, संबंधित महिलांनी आजच प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.योजनेअंतर्गत अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्याचे आढळून आले होते. विशेषतः कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी व निवृत्तीवेतनासंदर्भात चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक लाभार्थी अपात्र ठरले.
शासनाने स्पष्ट केले आहे की, लाभ घेण्यासाठी लाभार्थीच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी विभाग, शासकीय उपक्रम, महामंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत नियमित, कायमस्वरूपी किंवा कंत्राटी सेवेत नसावा. तसेच, कुटुंबातील कोणताही सदस्य निवृत्तीवेतनधारक नसणे आवश्यक आहे.ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया चुकीच्या माहितीमुळे अपूर्ण राहिली किंवा त्या अपात्र ठरल्या आहेत, त्यांनी आपली माहिती काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत ई-केवायसी प्रक्रियेत बदल करण्याची मुभा दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महिलांना मुदतीत ई-केवायसी दुरुस्ती करून योजनेचा लाभ निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना दिलासा मिळाला असून, ही शेवटची संधी असल्याने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.








