
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव करपते हा 12 वर्षांचा मुलगा सायकलने आपल्या घरी, सुकळी स्टेशन रोडकडे जात असताना, वर्धा दिशेने अती वेगाने येणाऱ्या टिप्परने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वैभव टिप्परच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला.
अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, वर्धा-नागपूर उड्डाण पूल परिसर हा आधीपासूनच धोकादायक ठिकाण म्हणून ओळखला जातो. येथे गतीरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज एका निष्पाप मुलाचा जीव गेला आहे, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे करपते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास सेलू पोलीस करत आहेत.
👉 प्रशासन जागं होणार कधी? आणखी किती निरपराध जीव गेले की उपाययोजना होणार?







