
वर्धा, प्रतिनिधी :
उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने व्यापक कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यातील 757 गावांमध्ये पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन 876 उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
योजनेअंतर्गत 192 गावांमध्ये 201 खासगी विहिरींचे अधिग्रहण, 103 गावांमध्ये 147 सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, तसेच 302 गावांमध्ये जलपुरवठा योजनांच्या 324 विशेष दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय 154 गावांमध्ये 198 नवीन बोअरवेल खोदण्याचा प्रस्ताव आहे. जुन्या बोअरवेलची दुरुस्ती आणि आवश्यकतेनुसार नवीन जलपुरवठा योजनाही सुरू करण्यात येणार आहेत.
दरवर्षी मार्चअखेर जिल्ह्यातील अनेक जलाशयांचा पाणी साठा कमी होतो. वाढत्या तापमानामुळे मे-जून महिन्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने संबंधित विभागांना तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. आवश्यकतेनुसार प्रभावित गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
दरम्यान, वर्धा शहर व आसपासच्या 14 गावांना महाकाली येथील धाम नदी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या येथे दोन दिवसांनी एकदा पाणीपुरवठा होत असून पुढील काळात त्यात कपात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धाम प्रकल्पात सध्या सुमारे 50 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.
प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे व जलसंवर्धनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.








